लेखक:डॉ.अभिमान निमसे
सहायक प्राध्यापक
भूगोलशास्त्र विभाग
छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा (स्वायत्त)
घटक महाविद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा
१४ जानेवारी -भूगोल दिन विशेष
१४ जानेवारी- भूगोल दिन का?
भूगोल विषय हा शाळा आणि महाविद्यालयातील अध्यापनाचा आंतरविद्याशाखीय विषय आहे. भूगोलास शास्त्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे. सर्व शास्त्रांची जननी म्हणून भूगोलाकडे पहिले जाते.भूगोलामध्ये पर्यावरण, मानव आणि प्राणीमात्रांच्या संदर्भामध्ये अभ्यास केला जातो. १४ जानेवारी राष्ट्रीय भूगोल दिन साजरा करण्यामागे डॉ.सी.डी.देशपांडे यांचे कार्य, १४ जानेवारीचा भौगोलिक संदर्भ, आणि भूगोल विकासाचे प्रयत्न या या विविध कारणामुळे १४ जानेवारी भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. भूगोलाचा प्रचार व प्रसार अथवा भूगोलाची उंची वाढवायची असेल तर भूगोलाचे दालन खुले केले पाहिजे. १४ जानेवारीला या दिनाच्या माध्यमातून असा प्रयत्न आपण करत असतो. प्रस्तुत लेखात थोडक्यात सामान्य नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, भूगोलाचे अभ्यासक यांना या दिनाची नेमकी कल्पना व भूगोलाचे महत्व लक्षात येईल या हेतूने लेखात विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे.
१.भूगोल दिन आणि सी.डी.देशपांडे यांचे कार्य
महर्षि डॉ. सी. डी. देशपांडे यांचा 14 जानेवारी हा जन्मदिन राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ.सी.डी.देशपांडे यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात १४ जानेवारी १९१२ रोजी झाला.त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर धुंडिराज देशपांडे. डॉ.देशपांडे हे शिक्षक, शिक्षणतज्ञ, लेखक, भूगोलतज्ञ, भूगालाचे गाढे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध होते. भूगोल विषयाच्या विकासात त्यांचे महत्वाचे योगदान आहे.या विषयास शास्त्राचा दर्जा प्राप्तीमध्ये अनेक प्रकारे उद्बोधन करण्याचे कार्य त्यांनी केले.शाळा व कॉलेज मध्ये भूगोल विकासासाठी प्रयत्न केले. मुंबई विद्यापीठात स्वतंत्र भूगोल विभागाची स्थापनेत त्यांचा महत्वाचा वाटा आहे. National Association of Geographers, India ची स्थापना केली. संपूर्ण भारतात १४ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो.भूगोलाची सर्वांना ओळख व्हावी या हेतून १४ जानेवारी १९९० रोजी डॉक्टर सी.डी देशपांडे यांच्या संकल्पनेतून डॉ.सुरेश गरसोळी यांनी महाराष्ट्र भूगोल समिती व भूगोल अध्यापक मंडळाच्या वतीने महाराष्ट्रात सर्वप्रथम १९९० मध्ये भूगोल दिन साजरा करण्यास सुरुवात केली. या भूगोल महर्षीच्या कार्याचा उचित गौरव करण्यासाठी १४ जानेवारी राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून आपण सर्वजण साजरा करतो.
२.भूगोल दिनाची भौगोलिक पार्श्वभूमी
पृथ्वीचे सूर्य सन्मुख आणि विन्मुख होणे :
पृथ्वीच्या आसाच्या तिरपेपणामुळे सूर्याचे उत्तर व दक्षिण दिशेकडे होणारे भासमान चलन म्हणजे उत्तरायण व दक्षिणायन होय. पृथ्वीच्या आसाचा तिच्या परिभ्रमण कक्षेच्या प्रतलाशी होणारा कोन 66.5 अंशाचा आहे. याचाच अर्थ पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेच्या संदर्भात 23.5 अंशानी झुकलेला आहे. पृथ्वीच्या तिरप्या आसामुळे पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करताना वर्षातील सहा महिने पृथ्वीचा उत्तर गोलार्ध तर सहा महिने दक्षिण गोलार्ध सूर्यासमोर झुकलेला असतो. पृथ्वीच्या गोलार्धाचे हे सूर्यसन्मुख व विन्मुख होणे किंवा सूर्याच्या भासमान सरकण्याला "अयन' म्हणतात
पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करताना वर्षातील सहा महिने पृथ्वीचा उत्तर गोलार्ध तर सहा महिने दक्षिण गोलार्ध सूर्यासमोर झुकलेला असतो. पृथ्वीच्या गोलार्धाचे हे सूर्यसन्मुख व विन्मुख होणे किंवा सूर्याच्या भासमान सरकण्याला "अयन' म्हणतात. दरवर्षी 22 डिसेंबरपासून सूर्य मकरवृत्तावरून उत्तरेकडे सरकू लागतो. तो 22 मार्च रोजी विषुववृत्तावर पोचून तसाच उत्तरेकडे सरकत 21 जून रोजी कर्कवृत्तावर पोचतो. या दिवशी सूर्यकिरणे कर्कवृत्तावर लंबरूप पडतात. हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस होय. आपला भारत देश उत्तर गोलार्धातच वसलेला आहे. दिनांक 22 डिसेंबर ते 21 जून या कालावधीत सूर्य रोज थोडा थोडा उत्तरेकडे सरकतो. कालावधीस "उत्तरायण' असे म्हणतात.
तारखेनुसार उत्तरायणाची सुरुवात 22 डिसेंबर रोजी असली तरी भारतीय तिथीनुसार ती पौष महिन्यात म्हणजे जानेवारीत होते. तसेच 14 जानेवारी रोजी येणाऱ्या मकरसंक्रांतीतील सूर्य धनू राशीतून मकरराशीत प्रवेश करतो. सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याचा काळ साधारणपणे एक महिना असतो. अशा बारा राशीतून बारा महिने त्याचा प्रवास सुरू असतो. 14 जानेवारी रोजी होणाऱ्या मकरसंक्रमणात (यंदा 15 जानेवारी) सूर्याच्या ऊर्जेचे संक्रमण होते. म्हणून हा दिवस भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. भारत हा आपणास सर्वांना माहीतच आहे की उत्तर गोलार्धामध्ये असणारा देश आहे. 14 जानेवारीपासून दिवस तिळा तिळाने मोठा होतो याच दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. तो दिवसही आपण मकर संक्रात म्हणून उत्साहाने साजरा करत असते. थोडक्यात उत्तरेकडे सूर्य सरकारला सुरुवात करतो.
३. भूगोल आपणा सर्वांना जवळचा का वाटतो ?
राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने भूगोल विषय महत्त्वाचा ठरतो राष्ट्रीय एकात्मतेचे काम भूगोल अभ्यास करू शकतात त्यांचे बंध, आपुलकी, जिव्हाळा या सगळ्या गोष्टी एक भूगोल अभ्यासक करू शकतो. प्रत्येकाला भूगोल विषयाच्या ज्ञानाची गरज आहे. जगातील बहुतेक लोकसंख्या शेती व्यवसायावर निगडित आहे शेती म्हणून भूगोल आपणा सर्वांना जवळच वाटतो शेतीशी निगडित आपल्या भारतातील लोक ही ७० टक्के च्या वर लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. भूगोलातून आपणास व्यापक ज्ञान मिळते. बदलत्या परिस्थितीचे ज्ञान मिळते. आधुनिक तंत्रज्ञान, नवीन शोध, परंपरागत ते आधुनिकतेकडे, विज्ञाननिष्ठतेकडे आज भूगोल विषयाची वाटचाल होत असताना आपणास दिसते. भूगोलामध्ये गुगल मॅप, जीपीएस,हवाई फोटो, जिओ सर्वेक्षण, ड्रोन टेक्नोलॉजी, उपग्रहाद्वारे मोजणी अशा अनेक प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे भूगोल हा विश्वासाहार्य व उपयोजित विषय बनलेला आहे. या सर्वामुळेच भूगोल अभ्यासकाचं व्यक्तिमत्व अष्टपैलू असते. कारण भूगोलामध्ये सर्व विषयांचा समावेश होतो.
४.भूगोल दिन साजरा करण्या पाठीमागचा उद्देश
वर्षभर अनेक दिन साजरे केले जातात. परंतु भूगोल दिन साजरा करण्या पाठीमागचा उद्देश सर्वव्यापी असतो. पृथ्वीवरील सर्व मानव जातींना जीवन जगताना भूगोल उपयुक्त असतो.आपणास माहित आहे की जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, जिकडे तिकडे सर्वत्र चराचरामध्ये भूगोल विषय आढळून येतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश पंचमहाभूतांमध्ये सुद्धा भूगोल हा समाविष्ट झालेला आहे. आपल्या जवळच्या दैनंदिन घटना पूर, महापूर, दुष्काळ, पर्जन्य, भूकंप तसेच देशाच्या सीमा, प्राणी संवर्धन, जलसंवर्धन, वायू, शक्ती साधने या सगळ्यांचा आणि माणसांचा जवळचा संबंध आहे. आपण पर्यावरणाचा जवळचा विषय म्हणून भूगोलाकडे पाहिले जाते. मानव आणि त्याचे पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियेचा अभ्यास म्हणजे भूगोल. अर्थातच मानवी जीवन आणि एकूणच मानवी संस्कृतीला आकार देण्याचे व विकासाचे कार्य भूगोलातून घडते.
५.भूगोल सर्वस्पर्शी विषय
भूगोलाचे स्वरूप हे वेगवेगळे असलेळे दिसून येते. प्रतिभावंतामध्ये, लेखक असेल किंवा कवी असेल, महाकवी कालिदास पासून भूगोलाचा स्वीकार अनेकांनी केलेला आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मध्ये भूगोलाचे वर्णन केलेल आहे. संत रामदास यांनी त्यांच्या साहित्यामध्ये भूगोल आणलेला आहे. राजा महाराजा यांच्या पत्र-व्यवहारांमध्ये भूगोलाचा स्पर्श झालेला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराज, पाहिले बाजीराव पेशवे यांनी बलाढ्य शत्रुविरुद्धही यशस्वी लढा दिला. त्यामागेही त्यांचे भूगोलाचे अचूक आकलन त्याचा योग्य वापर याचा मोठा वाटा होता. लेखक- कवी पासून सामान्य माणसापर्यंत आपला भूगोल पोहोचलेला आहे. मराठीचा प्रतिभावंत कवी सुद्धा मराठीचे प्रवास वर्णन लिहिताना भूगोलाचे नकळत छान वर्णन करतो हे आपणास विशेष लक्षात घेण्यासारखे आहे. प्रत्येक विषयाचा अभ्यास हा भूगोलात केला जातो. म्हणूनच भूगोल या विषयाला सर्व विषयाची जननी असे म्हटले जाते.
६.भूगोल आंतरविद्याशाखीय विषय
भूगोल हा विषय आंतरविद्याशाखीय आहे. ज्ञानाच्या विविध क्षेत्रात भूगोलाचे अध्यापन होत असताना आज दिसत आहे. भूगोलाच्या अनेक शाखा आहेत. प्राकृतिक भूगोल मानवी भूगोल या मुख्य दोन शाखा तर आहेतच त्याच्याशिवाय अनेक अशा उपशाखा असलेला दिसतात. आणि त्या प्रत्येक उपशाखेतून मानवाशी निगडित प्रत्येक बाबींचे ज्ञान मानव जातीला मिळत आहे. आर्ट्स, कॉमर्स,वैद्यकीय,अभियंता, खगोलशास्त्र, भूमाहितीशास्त्र, मोजाणीशास्त्र,स्थापत्यशास्त्र, विज्ञान इ. शाखेमध्ये हा विषय शिकवला जातो.
७.शालेय संदर्भाच्या बाहेर जाऊन या विषयाचे महत्त्व
` चार भिंतीच्या आत भूगोल हा शिकवला जात नाही तर संपूर्ण जग ही भूगोलाची प्रयोगशाळा आहे. या प्रयोग शाळेमध्ये अनेक अनुभव येत असतात. आणि ज्याला आपण आदरणीय काही गोष्टी म्हणतो, आपल्या पुज्य स्थानी ज्यांना आपण बसवलेले आहे त्याच्यामध्ये प्रेम, भक्ती, निष्ठा आहे. ती भू म्हणजे जमीन त्यास आपण भू -माता म्हणतो. ज्ञान हे ज्ञान माऊली होते, गीता गीताई होते, गाय हा प्राणी भूगोलामुळे स्वदेशी माता बनते. त्याच्या पुण्याईने पवित्र झाल्यानंतर आपल्या ओठातून सहज शब्द येतात .....आई थोर तुझे उपकार..... तर त्या आईला भूमातेला खऱ्या अर्थाने वंदन करण्याचा आजचा १४ जानेवारी हा भूगोल दिन आपण उत्साहाने साजरा करतो.आपल्या दैनंदिन कामकाजाचं, सर्वांचं मूळ या भूगोलामध्येच आहे. त्या भूमातेचं संदर्भात ऋण व्यक्त करायचं असेल तर भूगोल दिन आपणास साजरा करावाच लागेल.
८.भूगोल दिन कसा साजरा करायचा
भूगोल विषयातून व्यवहारिकता आपणास पटवून देता येते. कारण भूगोलातून जे ज्ञान मिळतं ते ज्ञान जीवन जगण्यास उपयुक्त ठरते. आणि मग ज्ञान स्पर्धा आयोजित करणे, प्रश्नमंजुषा स्पर्धा, प्रदूषण या विषयावर किंवा पर्यटन तसेच अन्य विषयावरती निबंध, वक्तृत्व स्पर्धा, चित्रमय प्रदर्शन भरवता येते. भौगोलिक सहली किंवा जवळच्या स्थळांना भेटी देणे, त्याची टिपणी काढणे, चर्चासत्रांचे आयोजन करणे, विविध विषयावर व्याख्यानांचा आयोजन करून भूगोल या विषयाची जागृती करता येते.त्याच पद्धतीने घोषवाक्य, समाज माध्यमातून भूगोलाची जागृती करता येईल. रेडिओच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा चॅनलच्या माध्यमातून आपणास या भूगोलची उंची वाढवता येते. हस्तलिखित सादर करता येते. एखादा नवीन विषय या हस्तलिखिताला विद्यार्थ्यांमध्ये देऊन उदाहरणार्थ भारतातील राज्य, महाराष्ट्रातील जिल्हे, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्र या विविध विषयावर हस्तलिखित तयार करता येते. त्याचप्रमाणे भौगोलिक साधनांचा साहित्याचे प्रदर्शन भरवता येते की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, नागरिकांना, पालकांना व समाजातील सर्वच घटकांना भूगोल या विषयाची ओळख किंवा भौगोलिक साहित्याची ओळख या माध्यमातून होईल. म्हणूनच भूगोलाचा प्रचार व प्रसार अथवा भूगोलाची उंची वाढवायची असेल तर भूगोलाचे दालन खुले केले पाहिजे. अशा पद्धतीने भूगोल दिन आपणास साजरा करता येतो.
९.भूगोलातील करिअरच्या वाटा
भूगोलाचे विद्यार्थ्यांना विविध शासकीय विभागात आणि संशोधन संस्थांमध्ये कामाची संधी मिळू शकते. शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षक प्राध्यापक म्हणून नोकरी करता येते. लोकसंख्या विश्लेषण. ग्रामीण विकास, सर्व्हेक्षण, स्पर्धा परीक्षा,जीआयएस इंडस्ट्री, पर्यावरण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या समाजसेवी किंवा शासकीय संस्थांमध्ये नोकरी मिळू शकते ब्रिटन व्यवसाय खूप मोठी संधी आहे त्याचप्रमाणे भौगोलिक पुस्तकांच्या नकाशाची निर्मितीमध्ये तुम्ही योगदान देऊ शकतात भूमापक व भूविकासक या व्यवसायाची कामाची संधी मिळू शकते
जीआएस स्पेशालीस्ट- भूगोलामध्ये रिमोट सेसिंग आणि जीआयएसमध्ये स्पेशलायजेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि रिमोट सेंसिंग एजन्सीत काम करण्याची संधी मिळते. आजकाल सर्व क्षेत्रात जीआयएसचे महत्व वाढले आहे त्यामुळे जीआयएस येणाऱ्या तज्ज्ञांची गरज कंपन्यांना भासते त्यामुळे भौगोलिक माहिती व्यवस्थेचे जाणकार म्हणून तुम्ही काम करू शकता, सध्या भूगोलाच्या विद्याथ्यांना या क्षेत्रात मोठ्याप्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
सर्व्हेअर- अभियंते, वास्तुविशारद (इंजिनीयर, आर्किटेक्चर) यांच्या सहकार्याने भूमापन, सर्वेक्षण अशी कामे शासकीय किंवा खासगी संस्थांसाठी करता येतात.
शासकीय कर्मचारी- केंद्र किंवा राज्य सरकारच्या भूविकास, भूनियोजन, भूमापन, भूजलविकास, गुन्हे अन्वेषण, दूरसंवेदन (रिमोट सेंसिंग) विभागात कामाच्या संधी मिळू शकतात.
हवामान तज्ञ- केंद्रीय हवामान विभाग, बातमी प्रसारण सेवा, हवामानविषयक वृत्त वाहिन्या इत्यादी क्षेत्रात संधी आहेत.
पर्यटन व पर्यावरण - पर्यटन क्षेत्र आज वेगाने विस्तारत आहे. भूगोलाचे पदव्युत्तर शिक्षण घेताना पर्यटनाचा अभ्यासक्रमात समावेश असेल तर उत्तम किंवा पर्यटनामध्ये पदविका मिळविल्यास देश-विदेशातील कंपन्यांमध्ये संधी मिळू शकते. तसेच चावरोवर एखाद्या परदेशी भाषेची जोड देता आली तर इतरांपेक्षा लवकर प्राधान्य मिळेल. यामध्ये पर्यावरणासंबंधी शिक्षण दिलं जाते. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्येही यासाठी विशेष पदे असतात.
भूगोलातील इतर करिअरची क्षेत्रे-अध्यापन,नकाशाकार, ड्राफ्टर, शहर व क्षेत्रीय विकासक, पर्यावरणीय व्यवस्थापक, संशोधक, स्तंभ लेखक,शहर नियोजक, लोकसंख्या तज्ञ तसेच भूगोलाचे विद्यार्थी लैंडस्केपिंग चांगल्या प्रकारे करु शकतात. त्यामुळे या क्षेत्रातही भूगोलाच्या विद्यार्थ्यांना संधी आहेत.अशी अनेक नानाविध नोकरीच्या संधी भूगोलातून विद्यार्थ्यांना मिळत आहेत.म्हणून आज बहुतांश विद्यार्थी म्हणूनच भूगोल विषयाच्या अभ्यासाकडे वळत असताना सर्वत्र दिसत आहे.
१०.भूगोल हा एक अविभाज्य घटक/विषय कसा आहे
एक वेगळा विषय का आहे असं जर म्हटलं तर भूगोल हा केवळ शेतकऱ्यालाच माहिती पाहिजे किंवा नोकरदाराला माहिती नसला तरी चालेल असे नाही. शेतकरी, नोकरदार किंवा घरकाम करणारे सर्व स्त्री पुरुष कोणताही व्यवसाय करणारे या सर्वांना अगदी विद्यार्थ्यापासून सामान्य नागरिकापर्यंत भूगोल माहीत असला पाहिजे. ज्यावेळेस शेतकरी शेतात काम करत असतो तेंव्हा शेतकऱ्याच्या अंगातून घामाच्या धारा गळत असतात. जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा आपला शेतकरी राजा कष्टत असतो त्या वेळेला सहज आकाशाकडे बघून म्हणतो की आज पाऊस येईल. कारण त्या शेतकऱ्याला जाणवतं की प्रचंड ऊन आहे म्हणजेच असणारा जो काही उपसागर आहे किंवा समुद्र आहे तेथील पाण्याची वाफ होईल, पाण्याचा ढग बनतील आणि पाऊस पडेल. हे तंत्र फक्त शेतकऱ्या कडेच आहे. घामाच्या धारा लागला की त्याला एक मात्र कळतं की पाऊस येणार आहे. पावसाळ्यामध्ये सहज आपण घराच्या बाहेर पडायचा असेल तर छत्री घेतो तिथेही भूगोलच आहे आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपणाला माहीत असते टोपी घालून बाहेर जायचे आहे. कारण बाहेर ऊंन आहे याची जाणीव आपणास भूगोलच्या ज्ञानानेच होते. अशा अनेक वेळेला भूगोलाचे ज्ञान पावलो-पावली उपयोगी पडत असते.भूगोलाचा अभ्यास विस्तृत आहे व्यापक आहे. त्याचा अभ्यास केला पाहिजे. परीक्षेत गुण मिळवण्यासाठी भूगोलाचा अभ्यास करायचा नाही तर जीवनाचे ज्ञान त्याच्यातून आपल्याला घ्यायचे असते. आणि म्हणून आपली व्यक्तिमत्व अष्टपैलू बनविण्यासाठी, बहुआयामी बनण्यासाठी भूगोलाचा अभ्यास जरूर करा. शालेय अभ्यासक्रमात 'सामाजिक शास्त्र (म्हणजे इतिहास,भूगोल, नागरिक शास्त्र) या विषयाचा एक उपविषय तो ४० गुणांचा एवढेच स्थान भूगोलाला दिले गेले.आपल्यापैकी नक्कीच शालेय अभ्यासक्रमात भूगोल विषय १०० गुणाचा कसा होईल यादृष्टीने पाहतील. भूगोलावरील लिहिलेल्या या शाब्दिक प्रपंचामुळेद्वारे भूगोलाचे महत्व सर्वज्ञात होईल व सदर लेख वाचणाऱ्यापैकी काही जण तरी भूगोलाच्या अभ्यासाकडे आकर्षित होतील अशी भूमिका हा लेख लिहिण्यामागील आहे.
सर्वांना भूगोल दिनाच्या सर्व भूगोल प्रेमींना हार्दिक शुभेच्छा!!
धन्यवाद!